Skip to main content

सुरूवात

नक्की दिवस आठवत नाही मात्र जवळपास 2002-2003 मध्ये मी ईटीव्हीमध्ये कामाला सुरवात केली. पहिली नोकरी, ती ही राज्याबाहेरची ,मुलगा एकटा बाहर जाणार कसा राहणार या काळजीने आईबाबा काहीसे चिंतेमध्ये होते. पण माझ्या मनात भीती नाही हे पाहून त्यांच्या मनातली भीती काहीशी कमी झाली होती. ही परिस्थिती फक्त माझ्या आईबाबांची होती असं नाही, नंतर आलेल्या अमित जोशी किंवा बाकीच्यांच्या घरीही जवळपास अशीच परिस्थिती होती.
कामाचा कुठेही अनुभव नव्हता, पाटी कोरी होती असा परिस्थितीत हैद्राबादचं रामोजी फिल्म सिटीमधलं ईटीव्हीचं ऑफीस बघितलं की भांबावल्यासारखं व्हायचं. नवीन होतो चुका व्हायच्याच होत्या. त्याकाळी अशा चुका केल्या ज्या मागे वळून पाहताना वाटतं की अतिशय शुल्लक होत्या. पण या सगळ्या चुका अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका होत्या. व्हीज्युअल्स मध्ये ब्लॅक जाणं, लोकांची नावं चुकीची जाणं (नावं माहिती असायची पण स्लग ऍस्टन मधील तांत्रिक बाबींमुळे ती चुकायची) या काळात मेघराज पाटील, गजाभाऊ कदम ही मंडळी डेस्क सांभाळायची आणि त्यांच्यावर अशोक सुरवसे होते. "काही" चुका वरिष्ठांनी माफ केल्या काहींबद्दल समजावलं, हळूहळू चुका कमी होत गेल्या आणि आत्मविश्वास वाढत गेला.

सुरवातीचे काही दिवस युकेगुडा नावाच्या ठिकाणी मुक्काम केला. नवीन आलेल्या माणसांसाठी काही दिवस राहण्याची या ठिकाणी सोय केली जायची. काही दिवसांनंतर रूम खाली करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहील्यासारखं वाटलं. कारण ओळखीचं कोणी नाही, यावेळी सचिन फुलपगारे नामक प्राणी उगवला आणि त्याने मदतीचा हात पुढे केला. घरी रहायला बोलावण्यापासून, सामान घरापर्यंत नेईपर्यंत आणि नंतर आयुष्यातले अनेक बरेवाईट प्रसंग शेअर करण्यापर्यंत याने मनापासून मला मदत केली. (योगायोगाने आमची जन्मतारीख सारखीच आहे). दिलसुखनगर भागात असलेल्या या घरामध्ये आशिष चांदोरकर, सचिन देशपांडे, अमित जोशी सचिन आणि मी इतके जण रहायचो. पण घरी एकत्र भेटल्याचे प्रसंग बोटावर मोजण्याएवढेच होते. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शिफ्ट असायच्या.

सगळ्यात भयानक असायची नाईट शिफ्ट पहाटे इतकी भयंकर झोप यायची , पण कामावर झोपणं म्हणजे कमी पणाचं लक्षण असं मनात भरवलं गेल्यानं झोपणं म्हणजे पाप असं म्हणत डोळे उघडे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत काम करायचो. आमच्यानंतर आलेली पोरं गाद्या गिरद्या, अंथरूण पांघरूण घेऊन बिनधास्त झोपायची. आणि आम्ही ईमानदारीचं च्युईंगम चघळत स्वतलाच दोष देत बसायचो. पण आज त्या पोरांकडे पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं की त्यांच्यात आणि माझ्यात काही ना काही तरी फरक आहे. पाट्या टाकण्यापेक्षा स्वतच नाव व्हावं ही ईच्छा कदाचित ईमानदारीच्या च्युईंगममुळे काही अंशी पूर्ण झालीय.

Comments

  1. होय, मला आठवतंय. एकदा ई टिव्हीच्या ऑफिस बाहेर आम्ही चहा पीत होतो. श्रीरंग म्हणाला अरे त्या शेखर फडकेपर स्टोरी होऊ शकते का ? मी म्हटलं होतं नाही. अरे त्या शेखर फडकेला कोण ओळखतं. श्रीरंग - अरे पण नवीन कलाकार म्हणून करता येऊ शकते ना. श्रीरंग खरतर स्टोरी शोधत होता. नवीन असताना असेच छोटे छोटे विषय स्टोरीसाठी आपण शोधत असतो. पण आता सुमारे सात वर्षानंतर पुन्हा श्रीरंग बरोबर काम करताना त्याला स्टोरी शोधण्याची गरज लागत नाही. कोर्टात त्यानं चांगला जम बसवलाय आणि राजकिय बातम्यामध्ये ही. आता त्याच्याकडे बातम्याच बातम्या असतात. काही अंशी नव्हे तर इमानदारीच्या च्युईंगममुळे त्याचं बरंच नाव झालंय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क