Skip to main content

प्रेक्षकांवर बलात्कार करणारी ‘ झी’ मराठी


 

रोजच्या कंटाळवाण्या जगात मनोरंजन म्हणून मालिका हा त्यांच्यावरचा हमखास उतारा, असं काहीसं चित्रं गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण, मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही प्रेक्षकांचा अंत पाहू लागलात, तर काही दिवसांतच झीचा सचिन पिळगावकर होऊ शकण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत. याची मुख्य कारणं दोन, एक म्हणजे संहिता आणि त्यांच्या निर्बुद्धाने लिहिल्या असाव्यात अशा वाटणाऱ्या पटकथा. आणि दोन.. सध्या झीचे मालिका सोडून मार्केटिंगचे बरेच काही इतर उद्योग सुरू आहेत, त्यामुळे स्पर्धेत ही वाहिनी आता मागे पडत चालली आहे.


९०च्या दशकात जेव्हा केबलचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स यायला लागले. त्यात मराठी भाषेतही आले. तारा, प्रभात, ईटीव्ही, मी मराठी आणि तेव्हाचं अल्फा (आताचं झी) मराठी. ही त्यातल्या त्यात प्रमुख नावं. त्यातलं झी हे नाव वगळता उरलेली सगळी नावं आता गुजरा जमाना झालीयेत. सुरुवातीलाच हे संदर्भ द्यायचं कारण म्हणजे झी मराठी या उरलेल्या चॅनलचा प्रेक्षकांवरचा वाढत चाललेला अत्याचार. मनोरंजनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवण्याचा चंगच झीने बांधलेला आहे.एकेकाळी याच वाहिनीने श्रीयुत गंगाधर टिपरे, व्यक्ती आणि वल्ली, घडलंय बिघडलंय, वादळवाट, पिंपळपान, प्रपंच अशा काही दर्जेदार मालिका दिल्यात हे आज सांगून पटणारही नाही, इतका झीचा दर्जा घसरत चालला आहे. कथांच्या नावाखाली काय वाट्टेल ते प्रेक्षकांच्या माथी मारण्याची स्पर्धा लावली तर त्यातही झी अव्वल येईल. बरं हे सगळं हळुहळू होत गेलेलं आहे. त्यामुळे उत्तम संहिता असलेल्या मालिकांनाही झीने म्हणावा तसा न्याय दिलेला नाही. आणि आता तर इतर वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झीने चक्क Factsची मोडतोड सुरू केली आहे. 


सध्या सुरू असलेल्या मालिका याचं उत्तम उदाहरण आहेत. त्यात पहिली येते ती लागिरं झालं जी ही मालिका. लय असत्यात मनमौजी, लाखात एक माझा फौजी अशी टॅग(!)लाईन घेऊन ही मालिका सुरू झाली होती. पण, त्यातली फौजी बनण्याची एकूणच प्रोसेस अत्यंत बाळबोध होती, हे कुणीही सांगू शकेल. नंतर येते ती तुझ्यात जीव रंगला. या मालिकेबाबत काय बोलावं.. एक सुशिक्षित बाई आडदांड आणि तितक्याच अडाणी माणसाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते. या मालिकेत एकाहून एक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उदा. पुरुषाचा कौमार्यभंग कसा करावा, आपल्याला मूल हवं की नाही याचा निर्णय गावाला विचारून कसा घ्यावा, परक्या माणसाचं मूल कोणतंही कायदेशीर दत्तकपत्रं न पूर्ण करता घरी कसं सांभाळायला ठेवावं, घरातील राजकारण न समजता बाहेर मंत्री म्हणून कसं मिरवावं.. याचं प्रशिक्षण हवं असेल तर ही मालिका अवश्य बघायला हवी. 

त्याच्या पुढची मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको.. ही मालिका म्हणजे तर कहर आहे. नवऱ्याची लफडी कळल्यानंतर त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला सोडण्यापेक्षा आमची नायिका काय करते, तर मसाले कुटते.. मसाले कुटून कुटून ती मोठ्ठी उद्योजिका बनते. एवढी मोठी की, करोडोंची उलाढाल असलेल्या नवऱ्याच्या कंपनीला विकत घेते... काय राव थट्टा लावलीये का.. आज प्रत्यक्षात कितीतरी लघुउद्योग असतील, जे भांडवलाशिवाय चालेनासे झालेत. आणि अवघ्या काही महिन्यात फक्त मसाले कुटून ही बाई कोटींची कंपनी विकत घेते.. प्रेक्षक मूर्ख आहे हे गृहित धरून मालिका पाडायची म्हटली की हे असंच होणार. 

त्याच्या पुढची मालिका.. देवीयों और सज्जनों.. दिल थामके बैठिये.. आता येताहेत.. दोन रुपये कमी करून कोटींचा फायदा करण्याचा अशक्य कोटीतला पराक्रम करणारे आणि आपल्याहून निम्म्या वयाच्या मुलीच्या प्रेमात (धपकन) पडणारे कोट्यधीश.. विक्रांत सरंजामे आणि पाटीवर खर्रकन पेन्सिल ओढावी तशा आवाजात बोलणारी नायिका, तिचे ते भयानक भाबडे आईबाबा, मनोरुग्ण वाटावा असा भावी नवरा.. या मालिकेचा तर सगळाच उजेड आहे. त्याच्या पुढची छत्रपती संभाजी महाराजांवरची मालिका म्हणजे आणखी भयंकर.. 

संभाजी महाराजांच्या चरित्रातले अनेक प्रसंग वादग्रस्त आहेत. वाद टाळावा म्हणून मालिकेत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे आणि अद्याप त्यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाहीये, हे विशेष! त्याच्या पुढच्या मालिकांचं तर नावच नको.. मध्येच चला हवा येऊ द्याची गाडी परदेशवारीच्या निमित्ताने रस्ता चुकली होती. ती आता कुठे वळणावर येतेय. त्यातल्या त्यात गाव गाता गजाली ही बघण्यासारखी मालिका आहे. बाकी मालिकांचा तसा आनंदच आहे. सध्याचा जमाना वेबसिरीजचा आहे. त्यामुळे रटाळ मालिकांसाठी आता प्रेक्षकांना एक चांगला पर्याय मिळायला लागला आहे. 

रोजची कामं करत टीव्ही बघणारा भाबडा महिला वर्ग सोडला तर तरुण आणि प्रौढांना आता झीचा कंटाळा येऊ लागला आहे. कारण, एकेकाळी याच वाहिनीने दर्जा म्हणजे काय, याचा वस्तुपाठ घालून दिला होता. सरळ साधी सोपी कथानकं, तगडे कलाकार आणि टीआरपीचं लफडं नसल्याने मोजक्या एपिसोड्समध्ये आटोपणारी पटकथेची मांडणी यांमुळे प्रेक्षकांच्या मनात झीने घर केलं होतं. आताही जो प्रेक्षकवर्ग झी मराठी बघतो, तो याच मालिकांची पुण्याई आहे. पण, या पुण्याईत भर घालण्याऐवजी झी लोकांची लग्न जुळवण्यात, न चालणारी साप्ताहिकं काढण्यात मग्न झालेलं आहे. त्यामुळे आता इतर उद्योग नको, पण मालिका आवर, असं प्रेक्षक झी मराठीला ओरडून सांगताना दिसताहेत..


Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क