Skip to main content

पाण्याचं महाभारत आणि आधुनिक द्रौपदी

 

मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलोय. राज्यात पडलेला दुष्काळ खासकरून जवळून बघितला, त्यावरून झालेलं राजकारणही बघितलं. या दुष्काळाच्या काळात एक बातमी ही आजही मला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या शहापूरपासून जवळच एक डेंगणमाळ नावाचं गाव आहे. या गावातील महिला टकल्या व्हायला लागल्या होत्या. केस जाण्यामागचं मुख्य कारण होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष. ही बातमी करायला गेलो असताना मला भलतीच बातमी सापडली.

डेंगणनमाळ अत्यंत गरीब आणि आदिवासी गाव आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरं जवळ असूनही हे गाव काही सुधारलेलं नाही. या गावातील महिला टकल्या व्हायला सुरुवात झाल्याचं कळालं. गावात गेलो. विचारलं की काय होतंय, कशामुळे या महिलांचे केस जायला लागले? यावर त्या महिला म्हणाल्या की आमचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जातो. एखा खेपेत जमेल तेवढं पाणी आणायचा प्रयत्न असतो. हंडा जड असतो, डोक्यावर घेऊन चालत येताना केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात, हे गेलेल केस काही परत येत नाही, परिणाम असा की टक्कल पडायला लागलं. महिलांशी बोलत असताना एक माणूस भेटला, त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की या गावात पाण्यासाठी जाम वणवण करावी लागते. घरातल्या सगळ्या बायका दिवसभर पाणी भरण्याचंच काम करतात. काहींनी तर पाणी भरण्यासाठी ४-५ लग्नही केली आहेत. मला भयंकर आश्चर्य वाटलं, मी त्यांना विचारलं, तुमच्या कोणी ओळखीचं आहे का ? त्यावर त्याने होय म्हणून मान हलवली आणि माझ्यामागे या असं म्हणून गावातल्या पायवाटेने चालायला सुरुवात केली. 

मला ज्या घरात नेण्यात आलं ते दादू भगत होतं, त्यावेळी त्यांचं वय जवळपास ५९-६० च्या घरात होतं. त्यांनी थोडंसं लाजत लाजतच एक फोटो दाखवला त्यांच्यासोबत तीन महिला उभ्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या. असं का? इतकी लग्न कशासाठी? असे दोन-तीन प्रश्न गोळीसारखे तोंडातून निघून गेले. मान खाली घालून ते म्हणाले की पहिली बायको जेव्हा गर्भवती होती, तेव्हा घरात पाणी भरण्यासाठी कोणी राहिलं नाही. मी एकटा आणून आणून किती पाणी आणणार. डोक्यावरून पाणी आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये, त्यामुळे मी दुसरं लग्न केलं. घरातील लोकांची संख्या वाढली तशी पाण्याची गरजही वाढली म्हणून तिसरं लग्न केलं. दुपारी उन्हाचा कडाका असल्याने पाणी भरता येत नाही. जे पाणी भरायचं ते ऊन चढायच्या आत आणि दिवस मावळायच्या पहिले भरायला लागतं. त्यामुळे भगत यांच्या घरात पाणी भरायला दोन महिला शिफ्टनुसार काम करायच्या एक महिला चूल आणि मूल सांभाळायची. महिलेचा नवरा गेला तर विधवेशी पुन्हा विवाह करण्याची पद्धतीही आदिवासींमध्ये आहे, त्यामुळे पाण्यासाठी पुरुष या विधवा महिलांसोबत लग्न करायचे ही परिस्थिती बघितल्यानंतर मला द्रौपदीची आठवण आली. महाभारतातील द्रौपदीने पांडवांसोबत संसार केला होता. इथल्या महिलांनीही परिस्थितीमुळे द्रौपदीत्व स्वीकारलं आणि एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न केलं.

ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भातसा धरण या गावापासून जवळच आहे, तरीही गावांना पाणी मिळत नाही. नळपाणी योजना आणणं तर दूरच राहीलं या पाड्यांना टँकरनेही पाणी पुरवठा केला जात नव्हता. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी या पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस युतीचं सरकार सत्तेत असतानाही ते इथले आमदार होते. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असूनही या गावांसाठी, पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली नव्हती. ती फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर करण्यात आली होती. जर या सरकारला ते शक्य झालं तर ते मागच्या सरकारला का शक्य झालं नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. गेल्या सरकारने हे काम केलं असतं तर त्यांच्यात आमदारांचं नाव झालं असतं. डेंगणमाळमधला फक्त पाण्याचा प्रश्न सुटला नसता तर एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथाही बंद झाली असती. दुष्काळ हा फक्त पाण्याची समस्याच घेऊन येत नाही, तर त्यासोबत असंख्य संकट आणि अडचणी घेऊन येतो हे डेंगणमाळने दखवून दिलं.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...