Skip to main content

गावाकडचे सुपरस्टार

युट्यूब आणि फेसबुकवर बी युनिक (BeYouNick) नावाचा चॅनेल चालवला जातोय. निकुंज लोटिया आणि तुषार खेर यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन उभा केलेला तो चॅनेल आहे. हा चॅनेल ख...त...र...ना...क हिट झालाय.पडद्यावर जेवढी हे दोघे धमाल करतात तेवढीच त्यांच्या चॅनेलची कहाणीही धमाल आहे.


मुंबई आणि उपनगरातील मंडळी उपहासाने डोंबिवलीला गाव म्हणतात, मी जिथे मिळेल तिथे त्याला ठोकून काढत डोंबिवली हे गाव नाही ते शहर आहे हे सांगत असतो. ठाणे आणि डोंबिवली ही दोन शहरं पत्रकारांची खाण आहे, अत्यंत नावाजलेली पत्रकार मंडळी, संपादक हे डोंबिवलीतून आले आहेत हे अनेकांना माहिती नाहीये. असो, हा विषय थोडा बाजूला ठेवूया आणि Be YouNick बद्दल बोलूयात. डोंबिवलीसारख्या शहरातील दोन तरुणांनी एकत्र येऊन एक युट्युब चॅनेल सुरू केला आणि तो इतका हिट झाला की आज या दोघांंचं आणि त्यांच्या चॅनेलचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे.
 

निकुंज हा पूर्वी फ्रीलांस बारटेंडर म्हणून काम करत होता, तर तुषार खेर हा इंजिनिअर म्हणून सिमेन्ससारख्या कंपनीत काम करणारा होता. एका जिममध्ये या दोघांची भेट झाली असं दोघांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या चॅनेलसाठी तुषार दुबईतील नोकरी सोडून परत भारतात आला आहे. यांच्या एपिसोडमध्ये साधारणपणे हेच दोघे मुख्य भूमिकेत असतात. हे युट्युब चॅनेल हिट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे व्हिडीओतील विषय. निकुंज आणि तुषारने सांगितलं की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वावरताना, घरात, ऑफीसमध्ये किंवा कुठेही जे चांगलं दिसतं, ज्यातून विनोदनिर्मिती होऊ शकते असे विषय आम्ही निवडतो. अचकट-विचकट, अंगविक्षेप किंवा वेडीवाकडी तोंडं करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्लील विनोद या सिरीजमध्ये कुठेही दिसत नाही. सेन्सॉरचं बंधन नसल्यानं ए.आय.बी सारखी अत्यंत शिवराळ भाषणा वापरणारी, सगळे नॉनव्हेज जोक असलेली सिरीज युट्यूबवर उपलब्ध आहे. मात्र बी युनिकमध्ये असली गोष्ट कुठेही दिसत नाही, हे या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. साधारणपणे ३ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार होता. या सामन्यासाठी मौका मौका नावाची एक जाहिरात तयार करण्यात आली होती, त्याची पॅरोडी म्हणजे विनोदी जाहिरात निकुंज आणि तुषारने तयार केली होती. तिचे युट्यूबवरील व्ह्यूज हे मौका मौकाच्या जाहिरातीपेक्षा जास्त झाले होते असं या दोघांनी सांगितलं आहे. 

इप्मिरिअल ब्ल्यू या दारूच्या ब्रँडने मेन विल बी मेन नावाची एक जाहिरातींची मालिका काढली होती, ही मालिका तुफान गाजली होती. यातल्या एका जाहिरातीमध्ये सुमीत राघवनही होता. निकुंज आणि तुषारने त्याचीही पॅरोडी तयार केली होती, जी देखील अत्यंत गाजली होती. 
पॅरोडी लोकांना आवडतेय कळाल्यानंतर त्यांनी नार्कोसमधल्या पाब्लो एस्कोबारचीही पॅरोडी काढली होती. हे सगळं मुंबईवाल्यांच्या दृष्टीने असलेल्या गावाकडेच म्हणजेच डोंबिवलीत होत होतं आणि त्याची दखल सगळं जग घेत होतं. असा दावा केला जातो, की निकुंज लोटिया हा आता युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दर महिना दहा लाख रूपये कमावतो, या दाव्याला आजपर्यंत कोणीही पुष्टी दिलेली नाही. आकड्याबाबत उलटसुलट दावे केले जाऊ शकतात, मात्र निकुंज आणि त्याची टीम ही या चॅनेलच्या माध्यमातून तगडी कमाई करायला लागली आहे. मुरली तेवर नावाचा त्यांचा मित्र आणि सिरीजमधला कलाकार आहे, त्याने शिक्षण सोडून दिलंय. 
या टीमने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना शूट कसं करायचं यातलं ओ का ठो कळत नव्हतं मात्र विनोद चांगला असला तर तो लोकांपर्यंत पोहोचतोच आणि त्यांना आवडतोच हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. पहिला व्हिडिओ शूट करत असताना ट्रायपॉडची उंची वाढवता येते हे निकुंजला माहितीच नव्हतं, उंचावरून दृश्यं टिपण्यासाठी तो फ्रीजवर जाऊन बसला होता. सुरुवातीला या टीमचा भर छोटे व्हिडीओ म्हणजे ३० ते ४० सेकंदांचे व्हिडीओ बनवण्याकडे कल होता तो आता बदलून या टीमने थोडे मोठे व्हिडीओ बनवणं सुरू केलं आहे. 

हल्ली मोठ्या कलाकारांनाही वेबसिरीजचं आकर्षण वाटायला लागलं आहे. निकुंज आणि त्याच्या टीमला या माध्यमाचं महत्व फार पूर्वीच कळालं होतं. ज्यामळे आज ते स्टार झाले आहेत. निकुंजने हसत हसत सांगितलं की आम्ही इतके फेमस झालोय की एकदा चुकून तिकीटाशिवाय प्रवास करत असताना टीसीने पकडलं, मात्र टीसीने मला ओळखल्याने त्याने मला जाऊ दिलं, एका वडापाववाल्याने देखील मला ओळखलं. ‘गावाकडची’ मंडळी फेमस होऊ लागली आहे, हे मुंबईकरांनी थोडं लक्षात घ्यायला हवं असं माझं या निमित्ताने म्हणणं आहे. गावाकडच्या या सुपरस्टार्सना कडक डॅब सेलिब्रेशन सॅल्यूट 
this is called as ' Dab Celebration' 

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क