Skip to main content

गावाकडचे सुपरस्टार

युट्यूब आणि फेसबुकवर बी युनिक (BeYouNick) नावाचा चॅनेल चालवला जातोय. निकुंज लोटिया आणि तुषार खेर यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन उभा केलेला तो चॅनेल आहे. हा चॅनेल ख...त...र...ना...क हिट झालाय.पडद्यावर जेवढी हे दोघे धमाल करतात तेवढीच त्यांच्या चॅनेलची कहाणीही धमाल आहे.


मुंबई आणि उपनगरातील मंडळी उपहासाने डोंबिवलीला गाव म्हणतात, मी जिथे मिळेल तिथे त्याला ठोकून काढत डोंबिवली हे गाव नाही ते शहर आहे हे सांगत असतो. ठाणे आणि डोंबिवली ही दोन शहरं पत्रकारांची खाण आहे, अत्यंत नावाजलेली पत्रकार मंडळी, संपादक हे डोंबिवलीतून आले आहेत हे अनेकांना माहिती नाहीये. असो, हा विषय थोडा बाजूला ठेवूया आणि Be YouNick बद्दल बोलूयात. डोंबिवलीसारख्या शहरातील दोन तरुणांनी एकत्र येऊन एक युट्युब चॅनेल सुरू केला आणि तो इतका हिट झाला की आज या दोघांंचं आणि त्यांच्या चॅनेलचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे.
 

निकुंज हा पूर्वी फ्रीलांस बारटेंडर म्हणून काम करत होता, तर तुषार खेर हा इंजिनिअर म्हणून सिमेन्ससारख्या कंपनीत काम करणारा होता. एका जिममध्ये या दोघांची भेट झाली असं दोघांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या चॅनेलसाठी तुषार दुबईतील नोकरी सोडून परत भारतात आला आहे. यांच्या एपिसोडमध्ये साधारणपणे हेच दोघे मुख्य भूमिकेत असतात. हे युट्युब चॅनेल हिट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे व्हिडीओतील विषय. निकुंज आणि तुषारने सांगितलं की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वावरताना, घरात, ऑफीसमध्ये किंवा कुठेही जे चांगलं दिसतं, ज्यातून विनोदनिर्मिती होऊ शकते असे विषय आम्ही निवडतो. अचकट-विचकट, अंगविक्षेप किंवा वेडीवाकडी तोंडं करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्लील विनोद या सिरीजमध्ये कुठेही दिसत नाही. सेन्सॉरचं बंधन नसल्यानं ए.आय.बी सारखी अत्यंत शिवराळ भाषणा वापरणारी, सगळे नॉनव्हेज जोक असलेली सिरीज युट्यूबवर उपलब्ध आहे. मात्र बी युनिकमध्ये असली गोष्ट कुठेही दिसत नाही, हे या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. साधारणपणे ३ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार होता. या सामन्यासाठी मौका मौका नावाची एक जाहिरात तयार करण्यात आली होती, त्याची पॅरोडी म्हणजे विनोदी जाहिरात निकुंज आणि तुषारने तयार केली होती. तिचे युट्यूबवरील व्ह्यूज हे मौका मौकाच्या जाहिरातीपेक्षा जास्त झाले होते असं या दोघांनी सांगितलं आहे. 

इप्मिरिअल ब्ल्यू या दारूच्या ब्रँडने मेन विल बी मेन नावाची एक जाहिरातींची मालिका काढली होती, ही मालिका तुफान गाजली होती. यातल्या एका जाहिरातीमध्ये सुमीत राघवनही होता. निकुंज आणि तुषारने त्याचीही पॅरोडी तयार केली होती, जी देखील अत्यंत गाजली होती. 
पॅरोडी लोकांना आवडतेय कळाल्यानंतर त्यांनी नार्कोसमधल्या पाब्लो एस्कोबारचीही पॅरोडी काढली होती. हे सगळं मुंबईवाल्यांच्या दृष्टीने असलेल्या गावाकडेच म्हणजेच डोंबिवलीत होत होतं आणि त्याची दखल सगळं जग घेत होतं. असा दावा केला जातो, की निकुंज लोटिया हा आता युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दर महिना दहा लाख रूपये कमावतो, या दाव्याला आजपर्यंत कोणीही पुष्टी दिलेली नाही. आकड्याबाबत उलटसुलट दावे केले जाऊ शकतात, मात्र निकुंज आणि त्याची टीम ही या चॅनेलच्या माध्यमातून तगडी कमाई करायला लागली आहे. मुरली तेवर नावाचा त्यांचा मित्र आणि सिरीजमधला कलाकार आहे, त्याने शिक्षण सोडून दिलंय. 
या टीमने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना शूट कसं करायचं यातलं ओ का ठो कळत नव्हतं मात्र विनोद चांगला असला तर तो लोकांपर्यंत पोहोचतोच आणि त्यांना आवडतोच हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. पहिला व्हिडिओ शूट करत असताना ट्रायपॉडची उंची वाढवता येते हे निकुंजला माहितीच नव्हतं, उंचावरून दृश्यं टिपण्यासाठी तो फ्रीजवर जाऊन बसला होता. सुरुवातीला या टीमचा भर छोटे व्हिडीओ म्हणजे ३० ते ४० सेकंदांचे व्हिडीओ बनवण्याकडे कल होता तो आता बदलून या टीमने थोडे मोठे व्हिडीओ बनवणं सुरू केलं आहे. 

हल्ली मोठ्या कलाकारांनाही वेबसिरीजचं आकर्षण वाटायला लागलं आहे. निकुंज आणि त्याच्या टीमला या माध्यमाचं महत्व फार पूर्वीच कळालं होतं. ज्यामळे आज ते स्टार झाले आहेत. निकुंजने हसत हसत सांगितलं की आम्ही इतके फेमस झालोय की एकदा चुकून तिकीटाशिवाय प्रवास करत असताना टीसीने पकडलं, मात्र टीसीने मला ओळखल्याने त्याने मला जाऊ दिलं, एका वडापाववाल्याने देखील मला ओळखलं. ‘गावाकडची’ मंडळी फेमस होऊ लागली आहे, हे मुंबईकरांनी थोडं लक्षात घ्यायला हवं असं माझं या निमित्ताने म्हणणं आहे. गावाकडच्या या सुपरस्टार्सना कडक डॅब सेलिब्रेशन सॅल्यूट 
this is called as ' Dab Celebration' 

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...