Skip to main content

प्रसारमाध्यमांनी गायब केलेले एसी सरकार


 

मला आदिवासी समाजाबद्दल प्रचंड कुतूहल वाटत आलंय. देशाच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला विविध आदिवासी जमाती सापडतील. अगदी काँक्रीटचे जंगल असलेल्या मुंबईतही आदिवासी आहेत. काँक्रीटचे जंगल विरूद्ध खरे जंगल या संघर्षात सातत्याने चेपला गेलेला ,शहराशी आणि शहरातील मानवी श्वापदांशी बुजून वागणारा आदिवासी समाज हा त्याच्या रितीरिवाजांसाठी ओळखला जाणारा आहे. जल,जमीन,जंगल याला सर्वस्व मानणाऱ्या आदिवासी समाजामध्ये एसी सरकार नावाची संकल्पना सुरू झाली होती, मात्र आज ती फक्त आदिवासींनाच माहिती आहे, शहरी भागातील लोकांना आणि प्रसारमाध्यमांना त्याची पुसटशीही कल्पना नाही. 


'न्यू'  इज 'न्यूज'  किंवा NORTH, EAST,SOUTH,WEST म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना म्हणजे न्यूज असं समीकरण आजही पक्कं डोक्यात बसलेलं आहे. असं असूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या व्याख्येत, परिमाणात बसूनही दिसत नाहीत किंवा दाखवल्या जात नाही. एसी सरकार ही त्यातलीच एक गोष्ट आहे. 2014 च्या निवडणुका कव्हर करायला गेलो असताना नंदूरबारमध्ये माझा मित्र भिकेश पाटील याने सर्वात पहिल्यांदा एसी सरकारबद्दल सांगितलं. विषय एवढा फॅनस्टॅस्टीक होता की निवडणुकीचं काम थोड्यावेळ बाजूला ठेवून मी ते ऐकत बसलो होतो. 

एसी सरकार म्हणजेच एन्टे ख्राईस्ट (AC) म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात असलेले सरकार. मी आधी म्हटल्यापूर्वी भूमीपुत्र कोण यावरून बराच वाद आहे, मात्र आदिवासी हे खरे भुमिपुत्र आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.  या आदिवासींचंही तेच म्हणणं आहे की आम्ही ख्रिस्ताने जन्म घ्यायच्या आधीपासून इथे आहोत, आणि इथे इतर कोणाचं नाही तर आमचं सरकार आहे. या भावनेतूनच एसी सरकार अशी मोहीम सुरू करण्यात आली. केसरी सिंह हे या मोहीमेचे शिल्पकार असल्याचं सांगितलं जातं. ही मोहीम आता त्यांचा मुलगा रवींद्र सिंह चालवतात. यांच्या कल्पना आणि विचार शहरी भागातील वाचकांना खुळचटपणाच्या वाटतील मात्र ते मला जाम मस्त वाटल्या. या कल्पना,विचारांमागे त्यांचे स्वत:चे तर्कही आहेत. त्यांचे विचार काय आहेत ते आधी आपण पाहूयात.


  • आईवडील हे या समूहामध्ये देवाच्या जागी मानले जातात
  • आईवडीलांना २ अंगठे छातीशी धरून नमस्कार करण्याची पद्धत आहे
  • वंदन करण्यासाठी ‘ स्वकर्ता पितु की जय’ असं म्हटलं जातं
  • समूहातील प्रत्येकजण नावापुढे एसी शब्द लावतात आणि त्यानंतर स्वत:चं नाव लावतात
  • सरकारी एकही दस्तावेज या समूहातील लोकांना मान्य नाही, रेशन कार्ड-आधार कार्ड याला ही मंडळी मानत नाहीत
  • शासकीय योजनांचा ही मंडळी कधीही लाभ घेत नाहीत

देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी समाज विखुरलेला आहे, मात्र एसी सरकार मानणारे आदिवासी हे प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यातील आहेत. एसी सरकारबाबतच्या कल्पना हास्यास्पद वाटत असल्या तरी त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आजपर्यंत स्वत:ला पुढारवादी म्हणवणाऱ्या किंवा सुसंस्कृत समाजाला अंगीकारता आलेल्या नाहीत. या गोष्टी कोणत्या आहेत त्यादेखील आपण पाहूयात

  • एसी सरकार समूह जात,पात,धर्म,पंथ मानत नाही. या मंडळींसाठी एसी सरकार हेच सबकुछ आहे.
  • ही मंडळी कर्ज घेण्याच्या सक्त विरोधात आहेत
  • ही मंडळी स्वत:ची जमीन कधीही विकत नाही
  • रुढीपरंपरा, कर्मकांड,रितीरिवाजही ही मंडळी मानत नाहीत
  • हे लोक निसर्ग पूजक असतात त्यामुळे जंगलाच्या आणि वन्यजीवांचे रक्षण करणे त्यांची मुख्य जबाबदारी समजतात
  • या आदिवासी समाजातील लोकांचा बाल विवाहाला विरोध आहे
  • एसी सरकार समूह व्यसनांच्या सख्त विरोधात आहे, या समूहाने आदिवासी भागात व्यसनमुक्ती साठी मोठी चळवळ उभारली आहे.

ही मंडळी एक रुपयाच्या जुन्यानोटेला फार मानतात, याचं कारण देखील आम्ही समजून घेतलं. या जुन्या नोटेवर भारत सरकार लिहलेलं आहे, बाकी सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत असं लिहलेलं आहे. 



जुन्या नोटेवर कोणाचीही सही नाहीये, मात्र इतर सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. यामुळेच बाकी सगळ्या नोटा एसी सरकार मानत नाही. एसी सरकार मानणाऱ्या आदिवासींचं दरवर्षी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र त्याची सिंगल कॉलम बातमी किंवा, एक फ्रेम व्हिज्युअल्सही कुठे दिसत नाही. अण्णा अण्णा असं म्हणणारा (तसा आवाज अजिबात येत नसूनही) कोंबडा, ढगांचे प्रकार, स्वर्गाची शिडी असल्या कुठल्याही विषयावर बातम्या होऊ शकतात मात्र एसी सरकारची एकही बातमी होत नाही याचं आश्चर्य वाटतं. एसी सरकार काळानुरुप बदलेलं आहे, नेत्यांकडे एक्सयूव्ही सारख्या गाड्या यायला लागलेल्या आहेत. हा पैसा कुठून आला, समाज कसा पुढारला याची चौकशीही कोणी करायला तयार नाही. जी मंडळी लोकनियुक्त सरकार मानत नाही, त्यांची निवडणुकीबाबत आता काय भूमिका आहे, नक्षलवादाच्या समस्येबद्दल काय वाटतं हे देखील कोणाला विचारावंस वाटत नाही. हा समूह लोकांपुढे न येण्यामागे माध्यमं हे महत्वाचं कारण आहे.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...