Skip to main content

सीबीआय नावाचा पोपट आणि आय़ुष्यातून उठलेला वैज्ञानिक


नंबी नारायणन

सर्वोच्च न्यायालयाने नंबी नारायण या इस्रोच्या वैज्ञानिकाला ५० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच दिलाय. या नंबी नारायणन यांच्या विस्ताराने बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र आजही सामान्य जनतेला विचारा की नंबी  नारायणन माहिती आहे का ? यावर त्यांच्या तोंडावरचे भाव ‘काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय’ असे दिसायला लागतील. हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. या देशात अमेरिकेतील सगळी लफडी ठावूक असतात, इस्रायल-पॅलेस्टीनच्या वादाबद्दल माहिती असते, सनी लिओनी तोंडपाठ असते मात्र नंबी  नारायणन कोणाला माहिती नसतो. केवळ यासाठीच हा ब्लॉग लिहणं गरजेचं वाटतंय.



नंबी  नारायणन इस्रोचे एक मोठे वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी संशोधन करणारं एक मोठं नाव. द्रव स्वरुपातील इंधनावर त्यांचे सातत्याने काम सुरू होते. ९० च्या दशकात अंतराळात बहुपयोगी ठरणारे उपग्रह पाठवायची सत्ताधाऱ्यांची जबरदस्त इच्छा होती. मात्र हे उपग्रह वाहून नेण्यासाठी ताकदवान रॉकेटची गरज असते. क्रायोजनिक इंजिन ही या रॉकेटसाठी वापरली जात होती. अमेरिकेसह फक्त ५ देश असे होते ज्यांकडे ही इंजिने बनवण्याची क्षमता होती. अमेरिका ही अख्खं जग आपल्याच बापाचं आहे अशा थाटात तेव्हा वावरत होती(अर्थात आत्ताही हा तोरा कमी झालेला नाही) भारताचा मित्र असलेल्या रशियाकडेही हे तंत्रज्ञान होते, मैत्रीचा धागा जपणाऱ्या रशियाने तेव्हा हे तंत्रज्ञान भारताला देण्याचं मान्यही केलं होतं, मात्र अमेरिकेच्या थयथयाटामुळे रशियाला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मग हे तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याचं ठरवण्यात आलं, ज्यात नंबी  नारायणन यांची महत्वाची भूमिका होती. अमेरिका हे तंत्रज्ञान विकसित होत असताना देशावर बारीक लक्ष ठेऊन होती.


नंबी  नारायणन यांच्या हाताखाली त्याकाळी २ हजार जणांची टीम कार्यरत होती, यावरून या माणसाचा मोठेपणा सहज लक्षात येऊ शकतो. नंबी  नारायणन जिओ सिंक्रोनस लाँच व्हेईकल ज्याला आज आपण सगळेजण 'जीएसएलव्ही' या शॉर्ट फॉर्मने ओळखतो ते तंत्रज्ञान विकसित करीत होते. अमेरिकेला हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जेवढा खर्च आला, त्याच्या एक तृतीअंश कमी खर्चात हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा  नारायणन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्धार केला होता.


कमी खर्चात निर्माण झालेल्या या तंत्रज्ञानाचा फायदा भारत इतरही देशांना देणार हे अमेरिकेला माहिती होते. भविष्यात आपली या क्षेत्रातील मक्तेदारी संपणार, आपला धंदा बुडणार हे अमेरिकेला दिसायला लागलं होतं. अचानक मल्याळम मनोरमा दैनिकामध्ये  नारायणन यांच्याविरोधात इस्रोची गोपनीय पाकिस्तानला पुरवत असून ते हेर आहेत अशा बातम्या छापून यायला लागल्या. ज्या दैनिकात हे छापून आलं होतं, ते नावाजलेले दैनिक आहे, साहजिकच आहे की लोकांचा आणि राष्ट्रीय माध्यमांचा त्यावर विश्वास बसला आणि हे प्रकरण देशभरात गाजायला सुरुवात झाली. तत्काळ प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.


काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय ही पिंजऱ्यातील पोपटासारखी असल्याचं विधान केलं होतं. सरकार जे सांगेल तसंच बोलायचं आणि करायचं असं सर्वोच्च न्यायालयाला सुचवायचं होतं. हे विधान मोदी सरकारच्या काळात झालं असलं तर युपीएच्या काळात परिस्थिती काही फार वेगळी नव्हती.



सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर जो अनुभव आला , नंबी  नारायणन यांनी हल्लीच काही माध्यमांसमोर मनमोकळेपणाने मांडला आहे ते म्हणाले की

'त्यांनी माझा सर्व प्रकारे छळ केला. हा छळ कल्पनेच्या पलिकडचा होता. त्यांनी दबाव टाकला मात्र हवी असलेली जबानी मी दिली नाही. जबानी न दिल्यास तुझ्या बायको, मुलांचेही असेच हाल करू अशी धमकी देण्यात आली. बाजूच्या रूममध्ये तुझी 84 वर्षांची आई आहे. एकतर तिला पाहण्यापूर्वी तू मरशील किंवा तुझे हाल पाहून बसलेल्या धक्याने ती मरेल.’


“त्यांनी चौकशी दरम्यान मला बसायला खुर्ची नाकारली. पिण्यासाठी पाणी दिले नाही. ‘ पाणी पिण्याची तुझी लायकी नाही’ असं ऐकवण्यात आलं. बहुधा मी 24 तासांपेक्षा जास्त काही न खाता-पिता आणि न झोपता या सर्वांचा त्रास सहन केला. क्रायोजनिकचे स्पेलिंगही ज्यांना सांगता येणार अशी ती मंडळी होती. मी त्यांना तपास अधिकारी न म्हणता गुंड म्हणेन” असं नंबी  नारायणन म्हणाले.




या प्रकरणाचा तपास आर.बी.श्रीकुमार नावाच्या अधिकाऱ्याकडे होता, या अधिकाऱ्याचे सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचे बरेच कारनामे आता समोर यायला लागले आहे. युपीएच्या काळात याच अधिकाऱ्याने गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. नंबी  नारायणन प्रकरणातून क्लिनचीट मिळावी यासाठी युपीए सरकारमधील काही लोकांच्या इशाऱ्यावर त्यांनी मोदींना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला होता. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचा साथीदार रईस खान आणि श्रीकुमार यांच्यातील संवादाची सीडीच बाहेर आली होती.


या संपूर्ण प्रकरणात जशी श्रीकुमार यांची भूमिका गडबडीची आहे तशीच ती तिस्ता सेटलवाड यांच्याबाबतीतही
आहे. सेटलवाड यांची ‘सबरंग’ नावाची सामाजिक संस्था होती जिची मान्यता भाजप सरकार आल्यावर रद्द करण्यात आली होती. या ‘सबरंग’ला २००४ ते २०१४ या काळात ‘फोर्ड फाऊंडेशन’ने २ लाख ९० हजार डॉलर्सची मदत पाठवली होती. ‘फोर्ड फाऊंडेशन’वर हिंदुस्थानी तपास यंत्रणांवर बऱ्याच आधीपासून नजर ठेवली होती. ही संस्था देशांतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा संशय होता. आरोप आहे की या फोर्ड फाऊंडेशनने सेटलवाड यांच्या संस्थेला समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी हा सगळा पैसा पाठवला होता.

आता सगळे तुकडे जोडून पाहूयात.
  • अमेरिका हे क्रायोजनिक इंजिनचे तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हती.
  • नंबी  नारायणन  यांच्या टीमने हे तंत्रज्ञानस्वस्तात बनवायचे ठरविले
  • श्रीकुमार आणि तिस्ता सेटलवाड यांचे काहीतरी लागेबांधे होते, हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय
  • सेटलवाड यांच्या संस्थेला अमेरिकेची मदत मिळत होती
  • नंबी  नारायणन संपले म्हणजे त्यांचे संशोधनही संपले असा एक विचार पुढे आला
  • हा विचार देशांतर्गत विकसित होणारं तंत्रज्ञान न बघवणाऱ्यांचा होता, म्हणजे तो अमेरिकाच असावा
  • सेटलवाडांच्या संस्थेला अमेरिका पैसा पुरवत होती, जी अमेरिकेला अडचणीच्या वाटणाऱ्यांना खूनखराबा न करता अडकवण्यासाठी वापरत असावी

हे एक मोठं घातक सर्कल तयार होतं. देशाबाहेरील शक्ती आपला देश कसा तोडू शकतात, याचं एक उदाहरण आहे. पण हे कोणाच्या इशाऱ्यावरून झालंय ते अद्याप कळायचंय. ते देखील काही दिवसात कळेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने नंबी  नारायणन यांची विनंती मान्य करत त्यांच्यावर कोणी खोटे आरोप केले हे शोधण्यासाठी निवृत्त न्यायमुर्तींद्वारे चौकशी करायचे आदेश दिले आहेत. नंबी  नारायणन यांनी आपल्याकडे ५ तत्कालीन मंत्र्यांविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात पुरावे आहेत हे सांगितलं, ते आयोगासमोर मांडले जातील तेव्हा मोठा भूकंप होणार हे निश्चित आहे. कोणतीही चूक नसताना, देशासोबत गद्दारी केल्याचा डाग पुसण्यात २०-२२ वर्ष घालवणाऱ्या नंबी  नारायणन यांना संघर्षाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यांचं कुटुंब उध्वस्त झालं, बायकोला बसलेल्या मानसिक धक्क्यातून अजून सावरू शकली नाही, लोकं देशद्रोही असल्यासारखे बघायला लागले आणि आर्थिक संकटंही ओढवली. सर्वोच्च न्यायालयाने ५० लाखांची नुकसान भरपाई दिली खरी, मात्र ते अपुरी आहे. नंबी  नारायणन यांची लढाई आता पैशांसाठी नाही तर देशातच राहून देशाविरोधात उंगल्या करणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी सुरू झालीय.




Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क