Skip to main content

पिकली देठं जाऊ द्या सुकली पानं बघा

भाजपाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालपरवा एक विधान केलं, ज्यात ते म्हाणाले की मी पण त्या "क्लिप्स" बघतो. त्यावर आलेल्या निषेधाच्या प्रतिक्रियांमध्ये शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या पक्षानं सध्या पिकल्या देठाचा नाही तर सुकल्या पानांचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. याचा अर्थ साधा आहे, राज्यात दुष्काळ पडलाय त्याकडे शिवसेनेनं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात नीलम गोऱ्हे यांना मिडीया अटेंन्शन हवं असेल तर भाग वेगळा.




उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, सुरूवातील मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे उस्मानाबादपासून दौरा सुरू करणार होते. मात्र असं बोललं जातं की तिथे जाण्यासाठी त्यांना खाजगी विमान मिळालं नाही. उस्मानाबादला गाडीनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र गाडीचा प्रवास नको म्हणून त्यांनी उस्मानाबादचा दौराच रद्द करून टाकला. अर्थात उद्धव ठाकरेंची सर्जरी झालेली आहे, त्यांना प्रवास झेपत नाही, मग असं असेल तर मग उस्मानाबादचं किंवा औरंगाबादचं प्रयोजन ठेवलंच कशाला असा प्रश्न पडू शकतो. शिवसेनेचे बहुतांश कार्यक्रम मातोश्री किंवा शिवसेना भवनात होतात, तिथेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बोलावून मदत देता आली असती. 


अभिनेता मरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर दोघेजण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुुटुंबियांना मदत देण्याचं काम करतायत. तर दुसरीकडे सरकार देखील दुष्काळाशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.  सरकारकडे अनेकजण मदतीचे धनादेश सुपूर्द करतायत. तर ज्यांना हा मार्ग अवलंबायचा नाही ते नाना आणि मकरंद यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवतायत. मग शिवसेना वेगळी जाऊन मदत का करतेय या प्रश्नाचं उत्तर मिळेनासं झालंय. शिवसेनेला शेतकऱ्यांना मदतच करायी होती तर मग त्यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे का दिला नाही ? उद्धव ठाकरेंचा ते ज्या सत्तेचा भाग आहेत त्या सरकारवर भरोसा नाही का ?


उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनाच दुष्काळाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला. राजकारणात असे आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. पण मग उद्धव ठाकरे वेगळं असं काय करतायत ? भाजपानं
आपल्याला दूर ढकललं किंवा आपणच भाजपाला हाकलून दिलं असं दाखवायचं असेल तर मग आपली व्होटबँक तयार व्हायला नको का ? या चिंतेने  पछाडलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वत:च मराठवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते औरंगाबाद पलिकडे मराठवाड्यात फिरकलेच नाहीत. 

उद्धव ठाकरे जर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर ते मातोश्रीवर बसून किंवा सेना भवनात बसूनच राज्याचा
कारभार हाकणार आहेत का ? तब्येत बरी नसली तर ते राज्याच्या विविध भागांचे दौरे करणार नाहीत का ? असे  प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे  'राजकारण करू नका'  असा सल्ला देणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही या मुद्दाचं राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करावी हे अपेक्षित आहे. 

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क