Skip to main content

जीवनदायी व्हॉटसअप योजना

व्हॉटसअप चांगलं का वाईट याबद्दल अनेकदा ऊलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. वाईट गोष्टींबद्दल जास्तच जोरात चर्चा होते. तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून मी हा ब्लॉग लिहीतोय.

माझा शाळेतला मित्र आहे दत्तात्रय मेटकरी म्हणून, त्याचा फोन आला त्याच्या परिचयाच्या एका माणसाला माझ्याशी बोलायचं होतं, मी त्याला सांगितलं की फोन करायला सांग. संतोष शिंदे नावाच्या माणसाचा मला फोन आला. संतोषचं ६ दिवसांचं बाळ होतं ज्यावर अवघड आणि महागडी शस्त्रक्रिया करायची होती.  त्या बाळाला वाडीया हॉस्पीटलमध्ये आणलं होतं.  मला संतोष शिंदेनं सांगितलं की वाडीयावाले शस्त्रक्रिया करायला तयार नाही त्याला दुस-या हॉस्पीटलमध्ये न्यावं लागेल.

मला त्याने त्याच्या बाळाचा फोटो पाठवला होता. तो फोटो आणि व्हॉटसअपचा एक मेसेज तयार केला आणि अनेक ग्रुपमध्ये पोस्ट केला. या ग्रुप्समध्ये पत्रकार होते, मंत्र्यांचे पीए होते, राजकारणी अशी अनेक माणसं होतं. त्यातल्या काही जणांनी संतोषशी संपर्कही साधला. अमेय खोपकरचा मला मेसेज वाचल्यानंतर फोन आला हे खरं आहे का (कारण मदत करा असं सागून फसवणारे अनेक जण आहेत) मी म्हटलं ही केस खरी आहे.  त्यानं मला विचारलं मी काय करू ? मी म्हटलं की तुला पैश्यांची काही मदत करता आली तर प्लीज बघ. थोडावेळानं त्याचा मला फोन आला म्हणाा रंग्या मी अँम्ब्युलन्स घेऊन निघालोय आपण त्या बाळाला शिफ्ट करूया.

माझा ऑफीसमधला मित्र मनीष आंजर्लेकर पण मदत मिळावी यासाठी फोनफोनी करत होता. मी त्याला विनंती केली की मला काम आहे ऑफीसमध्ये तू प्लीज वाडीया ला जाशील का ? त्यासोबत अक्षय भाटकर पण स्टोरी करायला निघाला. मी सतत मनीष, अमेय आणि अक्षयला फोन करत होतो.  त्या बापावर आणि त्या बाळाच्या आईवर काय ओढवलं असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येत होता. पोटच्या मुलाला खरचटलं तरी आईबाप चिंतेत पडतात, इथे या दोघांच्यावर फक्त ६ दिवसांच्या बाळावर भली मोठी शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली होती.

त्यातच या दोघांकडे पैसेही नव्हते, दुनिया इतकी हरामी असते, या मुलाच्या बापाला त्याच्या ओळखीच्या वकीलानं भेटायला बोलावलं आणि मदत करतो असं सांगून त्याला रस्त्यावर उभा करून ठेवलं होतं, मदतीसाठी हा लाचार झालेला बाप २-३ तास रस्त्यावरच उभा होता. या भडव्यांना फोडून काढायला हवं खरंतर, कारण मदत करायची नसेल तर करू नका पण कृपया असं आशेवर लावून कोणाला ताटकळत ठेवणं योग्य नाही.

अमेय आला त्यानं अँम्ब्युलन्,मधून मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये नेलं.  मला सिरीयसली आजही माहिती नाही की अमेयनं या सगळ्या उपचारादरम्यान किती खर्च केलाय. अमेय खोपकर, घरडा केमिकल्सचे निलेश कुलकर्णी, मनसेचे अभिजीत पानसे, नगरसेवक संतोष धुरी या सगळ्यांनी या उपचाराचा खर्च उचलायचं ठरवलं. या बाळाला जवळपास २० दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या बाळाचं काय झालं असेल असा अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा. सतत त्याच्या वडीलांना फोन करणं योग्य वाटत नव्हतं. अमेयलाही कळत नव्हतं. हॉस्पीटलचा पी.आर बघणारा भास्कर तारे हा माझा चांगल्या परिचयाचा आहे. त्याच्याकडून जमेल तेव्हढी माहिती घेत होतो.

एक दिवस त्या बाळाच्या वडीलांचा फोन आला, त्यांनी सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर बाळाला दोन दिवस आय.सी.यू मध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल आणि नंतर डिस्चार्ज मिळेल

खरंच सांगतो त्यावेळी इतकं बरं वाटलं की ते सांगता येणार नाही. बरीच टेन्शन असतात त्या सगळ्या टेन्शनपासून थोडावेळ मुक्तता मिळाली. कारण समाधान होतं एका छोट्याश्या बाळाला वाचवण्यात, एका कुटुंब पुन्हा सावरण्यात माझा थोडाफार का होईना हातभार लागला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी त्या बाळाला आणि बाळाच्या आईला दोघांना घरी जायला सांगून त्याच्या वडीलांना ऑफीसला बोलावलं. कारण मला या सगळ्या घटनेवर एक शो करायचा होता. माझी आणि संतोष शिंदे यांची ती पहिलीत भेट होती. संतोष सोबत डॉ.सुरेश जोशी ज्यांनी त्या बाळावर शस्त्रक्रिया केली होती, ते देखील आले होते. डॉक्टरांशी बोलताना त्यांनी सांगितलं की ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट होती कारण ह्रदयाला रक्त पुरवठा करणा-या शुद्ध रक्ताच्या आणि अशुद्ध रक्ताच्या वाहीन्या उलट सुलट झाल्या होत्या त्या  आपल्या मूळ जागी बसवण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. कथेचा शेवट गोड झाला त्यामुळे आनंद आहे.

ही सगळी घटना आटवल्यानंतर व्हॉटसअपचा असाही वापर होऊ शकतो हे कळालं. तंत्रज्ञानाचा विजय असो...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...