Skip to main content

वारी भाग - 1


वारी सुरू झालीय. स्टार माझामध्ये असताना दोन वर्ष वारी कव्हर केली. गेली दोन-तीन वर्ष काही जायला मिळालं नाही. वारी हे दोन शब्द आजही ऐकले की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. शून्य माहिती होती वारीबद्दल, पण वारी हा विषय असा आहे की तो पाठांतर आणि रिसर्च करण्यापेक्षा स्वत अनुभवून लोकांपर्यत पोचवणं जास्त सोपं असतं. अनेक लोकं स्वतला वारी स्पेशल तज्ञ म्हणवतात, पण वारीतला खरा तज्ञ असतो तो मैलो-न-मैल चालणारा वारकरी, जो कधीच काहीच बोलत नाही.


शहरात राहणा-या मंडळींचं वारीबद्दलचं ज्ञान म्हणजे खेडड्यातल्या गावंढळ लोकांची एक यात्रा एवढंच असतं. मात्र ही यात्रा नसून जीवन म्हणजे काय हे देहू-आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान समजवून सांगणारा प्रवास असतो. वारी बदलत चालली आहे. शेतक-यांबरोबर हायप्रोफाईल लोकंही वारीत सहभागी होतात, अविनाश भोसले आपल्या लव्याजम्यासोबत वारीत चालतात, आय.टी.वाले , विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वारीत जेवढं जमेल तेवढं अंतर पार करताना दिसतात. कित्येक विदेशी मंडळीही दिंड्या,पताका घेऊन चालताना दिसतात.

एरवी ज्यांच्याकडे लोकं पहातही नाही अशी मंडळी वारीतले हिरो असतात. प्रत्येक दिंडीमध्ये असणारे वीणेकरी, टाळ वाजवणारे, मृदंग वाजवणारे आणि अशा कित्येक जणांना दिंडीमध्ये अत्यंत मानाने वागवलं जातं. वारक-याला ,दिंडीला, वारीला शिस्त असते ती शिस्त कधीच मोडलेली बघायला मिळत नाही. जी लोकं भारतीयांच्या बेशिस्तीबद्दल शिव्या घालतात त्यांना खास या वारीमध्ये पंगतीत बसवून हिरव्या मिर्चीचा खर्डा आणि बंद झालेल्या नाकातूनही पाणी काढण्याची ताकद असलेली रस्सा भाजी खाऊ घालण्याची मला फार इच्छा आहे.

वारी कव्हर करताना असे प्रसंग बघितले की मी मूळापासून हादरलो होतो. मी माझा कॅमेरामन धीरज आणि त्याचा अटेंडंट संदीप गाडीतून जात असताना 100 पेक्षा जास्त वय असलेला एक म्हातारा भेटला, त्याला धड चालताही येत नव्हतं, डोळ्याने नीट दिसत नव्हतं, आणि ऐकायलाही येत नव्हतं. जमिनीवर बसून तो पंढरपूरच्या दिशेनं सरकत सरकत जात होता. आम्हाला दया आली त्याला गाडीत बसवला आणि पुढे निघालो. धीरज त्या म्हाता-याची मस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा धीरज पण गप्प बसला. त्या म्हाता-या बाबाचं नाव आठवत नाही पण तो मूळचा अहमदनगरचा राहणारा होता. मुलाला त्याने सांगितलं वारीला जायचंय. मुलानं नकार दिला, तर हा म्हातारा (खिशात एक पैसाही नव्हता) पळून वारीला आला. त्याच्या घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला की माहित नाही. आम्ही त्याला विचारलं तू बसून का चालतो तर त्याने पाय दाखवले (अनवाणीच चाललेला) पायाला फोड आलेले, चालल्याने ते फुटलेले आणि जखमा झालेल्या तरीही तो पंढरपूरला चाललेला. वारीत आपापल्या पद्धतीने सेवा करणारी अनेक मंडळी असतात. लोणी काळभोरचा एक तरूण डॉक्टर रतन काळभोर कोणत्याही वारक-याची मोफत सेवा करायचा. आम्ही त्याला फोन केला आणि त्या म्हाता-या बाबाला त्याच्यापर्यंत पोचवला. त्या म्हाता-याच्या चेह-यावर कुठेही दुख नव्हतं, कुठेही थकवा नव्हता(शरीरात थकवा होता कारण रतन काळभोर ने माझ्यामते त्याला सलाईन लावली होती) उपचार झाल्यानंतर तो म्हातारा परत गायब झाला. वारी संपताना पंढरपूरच्या जवळ तोच म्हातारा मला पुन्हा खुरडत सरकताना दिसला. आता या जिद्दीला आणि चिकाटीला काय म्हणाचं हेच मला कळत नव्हतं। माझ्यासारखा असता तर केव्हाच कोलमडून पडला असता आणि परत फिरला असता.यावेळी आम्ही त्या म्हाता-याला पुन्हा गाडी भरला आणि थेट पंढरपूरपर्यंत नेऊन पोचवलं.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...