Skip to main content

खाणा-याने खात सुटावे....

ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं अल्फा नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती.

सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याची इच्छा व्हायची) सगळं मिळायचं आणि ते ही फार कमी दरामध्ये (आमच्यासाठी हीच महत्वाची गोष्ट होती). या स्नॅक्स कॉर्नरव्यतिरिक्त आमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर थोडं दूर एका मुसलमान चाचाचं हॉटेल होतं. बाहेरून दिसायला टिनपाट हॉटेल होतं मात्र इथं मिळणारी पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी आणि चहा या दोन गोष्टी फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाच्या तोंडात मारेल अशा होत्या.

ऑफीसच्या परिसरात मात्र खाण्यापिण्याचा दुष्काळ होता. नाईच शिफ्टला जिन्यात येणारी ईडली आणि रात्री उशिरापर्यंत कॅन्टीमध्ये मिळणारे समोसे आणि पफ या दोन गोष्टींच्या जीवावर कित्येक ईटीव्हीयन्सनी दिवस काढले असतील. जे जेवण कॅन्टीनला मिळायचं ते देखील बघून न खाण्याची जास्त इच्छा व्हायची. सतत मिळणारा अर्धा कच्चा भात, सांबार आणि कुछकुठल्या भाज्या असे पदार्थ थाळीत असायचे.

आमच्या घरात प्रत्येक जण चवीनं खाणारा होता. आशिष चांदोरकर, सचिन फुलपगारे, मी राजेंद्र हुंजे या सगळ्या मंडळींनी गुढी पाडवा साजरा करायचं ठरवलं. गुढीसाठी भगवं वस्त्र आणलं, कलश नसल्याने तांब्या घेतला आणि आंघोळपांघोळ करून सगळ्यांनी गुढी ऊभारली. आजूबाजूच्या मंडळींना आम्ही हे काय करतोय काहीच कळत नव्हतं. गुढी ऊभारली, आता पुढे काय... गोडाचं जेवण पाहीजेच. पण मराठी पदार्थ मिळणार कुठे ? प्रत्येकाने आपापली अक्कल लढवली, मी आणि सचिन श्रीखंड शोधायला बाहेर पडलो. (हैद्राबादमध्ये श्रीखंड शोधणं हे वाळवंटात पाणी शोधण्यापेक्षा कठीण काम होतं हे तेव्हा कळालं) घरी आशिष आणि हुंजे ने पु-या बनवायला घेतल्या. आमच्या घराच्या समोरच राहणा-या केतकी लोणकर-जोशीने बटाट्याची भाजी आणि काहीबाही पदार्थ बनवले होतं. कायकाय उपद्व्याप करून सगळ्यांनी अथक प्रयत्नांनी मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवलं आणि पंचपक्वान्न मिळाल्याच्या आनंदात फस्त केलं.

यामुळेच जसं मी म्हटलं तसं ईटीव्हीमधलं जीवन हे विविध खाद्यपदार्थांनी ख-या अर्थानं सुसह्य केलं होतं

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...